छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे १६४६ मीटर (५,४०० फूट) उंचीचे कळसुबाई शिखर अवघ्या चार तासांत सर करून छत्रपती संभाजीनगरातील दोन लहानग्या बहिणींनी उल्लेखनीय पराक्रम गाजवला आहे.
केवळ चार वर्षे आठ महिन्यांची तनिष्का नवनाथ वेताळ आणि सात वर्षे अकरा महिन्यांची तिची मोठी बहीण नित्या नवनाथ वेताळ यांनी आपल्या कुटुंबासोबत हा थरारक ट्रेक पूर्ण केला. दोघींचे शिक्षण सीएसएमसी, गारखेडा येथे सुरू असून तनिष्का ही ज्युनिअर केजीत तर नित्या तिसरीत शिकते.
आई रेणुका, वडील नवनाथ तसेच काका बाळासाहेब वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही बहिणींनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता बारी गावाच्या पायथ्यावरील हनुमान मंदिरातून ट्रेकला सुरुवात केली. अवघ्या चार तासांत म्हणजेच सकाळी अकरा वाजता त्यांनी सर्वोच्च शिखरावरील कळसुबाई मंदिर गाठले. त्यावेळी भारतीय तिरंगा फडकावत शिखराला मानवंदना देण्याचा क्षण त्यांनी अनुभवला.
या पराक्रमापूर्वी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहन उबाळे यांना माहिती दिली होती. उबाळे सरांनी या दोघींच्या धाडसाचे व चिकाटीचे मनःपूर्वक कौतुक केले.
पावसाळ्यातील कळसुबाई ट्रेक म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव मानला जातो. धुके, दऱ्या-खोऱ्या, झरे-धबधबे आणि ढगांच्या सान्निध्यात चालत जाणारा रोमांचकारी प्रवास या लहानग्यांनी अनुभवला. विशेषतः ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील स्टीलच्या शिड्या आणि लोखंडी रेलिंग पार करताना त्यांनी मृत्यूला नजर देणारा थरारही पार पाडला.
वडिलांकडून प्रेरणा घेत या दोन्ही बहिणींनी केवळ चार तासांत शिखर सर करून — वय लहान असले तरी पराक्रम मोठा असतो हे दाखवून दिले आहे.





