स्पोर्ट्स पॅनोरमा ब्युरो
दिल्लीतील कथित NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना भारतरत्न आणि क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर एक भावनिक आणि विचारप्रवर्तक पोस्ट शेअर केली आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपासून दूर राहत, सचिनने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आणि प्रामाणिकपणा व गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन केले आहे.
“अपयश चालेल, पण फसवणूक नाही”
सचिनने आपल्या पोस्टमध्ये दिवंगत वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या शिकवणीचा उल्लेख करत लिहिले की, “माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी मला एक गोष्ट नेहमी शिकवली—अपयश आले तरी चालेल, पण फसवणूक करू नकोस. आयुष्यात कधीही शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नकोस.”
ही शिकवण आजही आपल्या आयुष्यात तितकीच महत्त्वाची असल्याचे सचिनने नमूद केले.
“विद्यार्थ्यांची निराशा समजण्यासारखी”
सचिनने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. दिवसरात्र मेहनत करूनही योग्य संधी किंवा न्याय मिळत नसल्यास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी निराशा स्वाभाविक असल्याचे त्याने म्हटले. “जेव्हा विद्यार्थ्यांना वाटते की त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळाले नाही, तेव्हा त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. पुन्हा अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.”
“गुणवत्तेचा विजय होणारी संस्कृती घडवूया”
सचिनने आपल्या पोस्टमध्ये आजच्या तरुण पिढीबद्दल आशावाद व्यक्त करत म्हटले की, भारताचा तरुण वर्ग स्वप्नांनी आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. हीच ऊर्जा देशाच्या प्रगतीचा पाया आहे.
त्याने पालक, शिक्षक, शाळा, प्रशासकीय यंत्रणा आणि समाजातील प्रत्येक घटकाने तरुणांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगितले. “अशी संस्कृती निर्माण झाली पाहिजे, जिथे मेहनतीचा सन्मान होईल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळेल आणि गुणवत्तेचा विजय होईल.”
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सचिन तेंडुलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी तिचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत सकारात्मक आणि संयमी संदेश दिल्याबद्दल नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.


