छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) निवडणूक प्रक्रियेत गुरुवार (१२ जून) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज असून त्यानंतर निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांसह सदस्यांचेही लक्ष आजच्या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक पदांसाठी एकापेक्षा अधिक उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र माघारीच्या प्रक्रियेनंतर काही पदांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये दिवसभर बैठका, चर्चा आणि मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
विशेषतः उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि सदस्य पदांसाठी अनेक दिग्गजांनी दावेदारी कायम ठेवल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. माघारीनंतर कोणते उमेदवार रिंगणात कायम राहतात आणि कोण माघार घेतात, यावर पुढील निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत.
माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यानंतर प्रचाराला अधिकृत सुरुवात होईल आणि विविध गटांकडून सदस्यांशी संपर्क वाढविण्यात येणार आहे.
एडीसीएच्या आगामी कारभाराची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अतुल सावे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली असली, तरी उर्वरित पदांसाठीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या अंतिम उमेदवारांच्या यादीकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





